बीड| प्रतिनिधी
नगरपालिकेच्या राजकारणात सध्या मोठी अनिश्चितता निर्माण झाली असून, नगराध्यक्ष घड्याळ चिन्हावरून निवडून आले असले तरी प्रत्यक्ष सत्तेचा किल्ला अजूनही पूर्णपणे त्यांच्या ताब्यात आलेला नाही.
कारण नगरपालिकेत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत सध्या त्यांच्या गटाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे नगरपालिकेतील सत्ता संतुलन राखण्यासाठी आणि कारभार सुरळीत चालवण्यासाठी इतर गटांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे.नगरपालिकेच्या कोणत्याही सभेत एखादा ठराव मंजूर करायचा असेल, विकासकामांना मंजुरी द्यायची असेल किंवा प्रशासनाशी संबंधित निर्णय घ्यायचे असतील, तर बहुमत अनिवार्य असते.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित दादा पवार गटाकडे एकूण 19 नगरसेवक आहेत. मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी किमान 27 नगरसेवकांची आवश्यकता आहे. म्हणजेच अजित पवार गटाला अजून 8 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे.दुसरीकडे, शरद पवार गटाकडे 12 नगरसेवकांचे संख्याबळ आहे, तर भारतीय जनता पक्षाकडे 15 नगरसेवक आहेत. ही आकडेवारी पाहता, कोणत्याही एका पक्षाकडे स्वतंत्र बहुमत नसल्याचे स्पष्ट होते.
त्यामुळे आगामी काळात नगरपालिकेतील राजकारण युती, आघाडी आणि पाठिंब्यावर अवलंबून राहणार आहे.या सगळ्या समीकरणांमध्ये ‘क्षीरसागर’ हे नाव पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे. नगरपालिकेतील सत्तासंघर्षात क्षीरसागर गटाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सारिका ताई क्षीरसागर यांनी केलेले वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे.
“संदीप क्षीरसागर आमचे धीर आहेत,” असे विधान करत त्यांनी दोन्ही क्षीरसागर गट एकत्र येण्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.सारिका क्षीरसागर यांच्या या वक्तव्यानंतर नगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जर दोन्ही क्षीरसागर गट एकत्र आले, तर ते कोणाच्या बाजूने उभे राहणार, हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे. अजित पवार गटासाठी हा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो, तर दुसरीकडे शरद पवार गट आणि भाजपसाठीही क्षीरसागर गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
दरम्यान, राजकीय वर्तुळात आणखी एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे. येत्या 26 तारखेला अजित दादा पवार गट आणि शरद पवार गट संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पत्रकार परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याबाबत मोठी घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून विभक्त असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जर अजित दादा पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते एकत्र आले, तर केवळ स्थानिकच नव्हे तर राज्याच्या राजकारणावरही त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे, दोन्ही गटांमधील मतभेद, नेतृत्वाचा प्रश्न आणि भविष्यातील राजकीय दिशा यामुळे हा निर्णय कितपत सोपा असेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.सध्याच्या परिस्थितीत नगरपालिकेतील बहुमताचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
नगराध्यक्ष असले तरी निर्णय प्रक्रियेत अडथळे येण्याची शक्यता असून, प्रशासन आणि विकासकामांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत होणाऱ्या राजकीय घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.एकीकडे भाजप आपली पुढील भूमिका ठरवण्यासाठी हालचाली करत असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण, क्षीरसागर गटाची संभाव्य एकजूट आणि 26 तारखेला होणारी पत्रकार परिषद यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.अजित दादा पवार आणि शरद पवार एकत्र येतात की स्वतंत्रपणे पुढचा राजकीय प्रवास ठरवतात, यावरच नगरपालिकेतील सत्ता समीकरण ठरणार आहे.
सध्या तरी बहुमताचा पेच कायम असून, पुढे काय होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.







