बीड,
अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे कापूस व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकीकडे उत्पादन खर्च प्रचंड वाढला असताना दुसरीकडे बाजारात शेतमालाच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने ठरवलेला हमीभाव जमिनीवरील वास्तवाशी सुसंगत नसल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी पुत्रांनी ‘शेतकरी हक्क मोर्चा’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा २५ डिसेंबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असून त्यासाठी गावपातळीवर बैठका सुरू आहेत.
‘एक लढा मातीसाठी’ या ब्रीदवाक्याखाली बीड जिल्ह्यातील युवा शेतकरी पुत्र एकवटले असून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठका घेऊन शेतकरी जागृती मोहीम राबवली जात आहे. २५ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, बीड येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतात राबणाऱ्या बापाच्या हक्कांसाठी हा लढा असल्याची भावना शेतकरी पुत्रांनी व्यक्त केली.
या मोर्चामध्ये कापसाला १२ हजार रुपये आणि सोयाबीनला ७ हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करण्याची प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. यासोबतच सीसीआयची ऑनलाइन खरेदी प्रक्रिया सुरळीत करावी, विदेशातून कापूस व सोयाबीनची आयात थांबवावी, शेतमालाला योग्य दर मिळण्यासाठी ठोस व धोरणात्मक पावले उचलावीत, अशा विविध मागण्या शासनाकडे करण्यात येणार आहेत.
या संदर्भात झालेल्या बैठकीस राजेंद्र आमटे, डॉ. गणेश ढवळे, अशोक येडे, प्राचार्य तांदळे, अमर शेख, अॅड. गणेश मस्के, गणेश नाईकवाडे, नितीन जायभाये, अमोल पाठक यांच्यासह शेतकरी व शेतकरी पुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.







